13/12/2018
*प्रत्येक मराठी घरातील एकाने तरी विदेशात गेले पाहिजे*
--------------------------------
केरळ ३.३ कोटी लोकसंख्या असणारे राज्य. ९७% साक्षरता, प्रत्येक गावात इंग्रजी शाळा. सर्वात कमी भ्रष्टाचार असणारे राज्य, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारतात प्रथम क्रमांक. तब्बल ४० लाखांहून अधिक केरळी बांधव विदेशात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. प्रत्येक वर्षी ते आपल्या घरी पैसे पाठवतात. २०१५ साली त्यांनी तब्बल १ लाख २५ हजार कोटी रुपये भारतात आपल्या घरी पाठवले होते, म्हणजे सरासरी एका कुटुंबात ५ लाख रुपये. कोणत्याही घरात गरीबी नाही. केरळच्या खेड्यापाड्यात तुम्ही गेलात तर तुमचे डोळे दिपतील असे बंगले, गाड्या व राहणीमान दिसेल.
बघा कोणकोणत्या देशात किती केरळी बांधव आहेत. युएई ८ लाख, सौदी ५ लाख, कुवेत ६ लाख, ओमान १.५ लाख, बहरीन १ लाख, कतार १ लाख, सिंगापूर १ लाख, आफ्रिका २ लाख, युएसए ३.५ लाख, मलेशिया २ लाख, युके १.५ लाख, कॅनडा १.५ लाख,मॉरीशस ८ लाख, ऑस्ट्रेलिया ३ लाख, नेदरलँड १ लाख, न्यूझीलंड १.५ लाख, फ्रान्स ६५ हजार, आयर्लंड १ लाख इतक्या देशात केरळी बांधव नोकरी व व्यवसाय करतात. ते हॉटेल, शिपिंग, बांधकाम, इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर, इम्पोर्ट, एक्सपोर्ट इत्यादी क्षेत्रात काम करतात. केरळ मधील अगदी दहावी नापास झालेला जरी मुलगा असेल तर तो खाजगीत लहान मोठा टेक्निकल कोर्स करतो थोडा अनुभव घेतो, पासपोर्ट काढतो व विदेशात जातो. तिकडे जाऊन तो महिना किमान ५० हजार पगार वयाच्या १८ ते २० दरम्यान कमवायला लागतो. वयाच्या तिशीपर्यंत तो कोट्याधीश झालेला असतो. गावी त्याचा अलिशान बंगला गाडी असते, त्याचे आई वडील आनंदात राहत असतात.
आपल्याकडील मुलं एमए, बीएड करतात, एखाद्या संस्थेत फुकटात दोन चार वर्षे राबतात, शेवटी नोकरीसाठी १०-२० लाख मागितले जातात, तोपर्यंत वयाची तिशी गाठलेले असते, डोक्याचे अर्धे केस पांढरे झालेले असतात. शेवटी नोकरीत राखीव जागा मिळाव्यात म्हणून अशी लाखो बेकार मराठी मुलं मोर्चात सामील होतात. एकीकडे आपल्याकडे लाखांचे मोर्चे निघतात, तर दुसरीकडे लाखो केरळी बांधव लाखो करोडो रुपये परदेशातून कमवून आणत आहेत.
आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केरळातील संस्थांनी संचलित इंग्रजी शाळा निघत आहेत. आपले पालकही मुलांना त्या शाळेत घालत आहेत कारण त्यांचे इंग्रजी चांगले आहे. इकडच्या बीएड मुलांना तेथे नोकरी मिळत नाही, कारण इंग्रजी येत नाही. त्यामुळे लवकर गाव सोडा, इंग्रजी शिका, व्यवसायाभिमुख तंत्र शिकून घ्या, विदेशात जा डॉलर, पौंड कमवा. बिनकामाचे शिकण्यात व आंदोलने करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येक मराठी घरातील एक माणूस तरी विदेशात गेलाच पाहिजे. आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
*माहीती संकलन*
*©मराठा व्यवसाय संघ,महाराष्ट्र*